प्रेरणादायी
मराठी कथा
सामाजिक
ती खरी जिगरबाज..........!!
गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२०
शर्वरी आणि सागरच्या लग्नानंतर दोन वर्षात त्यांना बाळाची चाहूल लागली. साहजिकच सगळं घर आनंदून गेलं. सर्वकाही नीट होतं, पोटातलं बाळही नीट वाढत होतं. मात्र आठव्या महिन्यात रेग्युलर सोनोग्राफीला गेलं असता कळलं, बाळाच्या दोन्ही किडन्यांची साईझ नॉर्मल नव्हती. त्या छोट्या होत्या. त्या नीट क्रिया करू शकणार नव्हत्या. हा मोठाच धक्का होता, शर्वरी आणि सागरसकट दोन्हीकडच्या कुटुंबासाठीही.
तरीही खचून न जाता सर्वांनीच जे आहे, त्याला सामोरी जायचं ठरवलं. शर्वरीला अजूनही वाटत होतं, बाळ पोटातून बाहेर आल्यावर कदाचित हे खोटही ठरू शकेल. कदाचित सर्वकाही छानही असेल.
खरंतर बाळ आल्यावर तसं छानच होतं. त्यांना सोनोग्राफीतून कळलं नसतं तर असं काही असेल असं वाटलही नसतं. बाळ त्याच्या सगळ्या क्रिया व्यवस्थित करत होतं.
पण कळलं होतं म्हणूनच अगदी सातव्या दिवसापासून उपचार सुरू झाले बाळाचे. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत होते त्याला घरचे सर्वहीजण. निहार........ इतरांसारखाच वाढत होता, बघून तर कुणाला वाटतही नव्हतं, त्याला असा काही प्रॉब्लेम असेल म्हणून. तो तसा नॉर्मल होता, त्याचं श्रेय घरच्यांचं. मुंबईतील मोठया हॉस्पिटलमध्ये त्याचे उपचार चालू होते. त्यासाठी सारखं जावं लागायचं. उपचाराचा खर्चही मोठा होता. मानसिक, शारीरिक ताणाबरोबर पैशाचा सुद्धा ताण मोठा होता. पण आपला मुलगा इतरांसारखा वाढतोय, हे बघून शर्वरी आणि सागर सगळा त्रास विसरून जायचे.
पण कुठपर्यंत? निहार लहान होता, अगदी पाच वर्षापर्यंत कसंबसं त्याला कंट्रोल मध्ये ठेवण्यात यश मिळवलेलं, शर्वरीने. पण नंतर मात्र जसा मोठा होऊ लागला, तसं ते तिला खूप जड जाऊ लागलं. त्याची पथ्यं खूप होती. बाहेरचं काहीही त्याला खायला द्यायचं नव्हतं. पण निहारला मात्र कुणाच्या हातात असं काही बघितलं की खायचा मोह व्हायचा. त्याला तिखट, तेलकट, चमचमीत, चॉकलेट, शीतपेयं,आईस्क्रीम खायला परवानगीच नव्हती. आणि तेच सगळं त्याला खूप खावं वाटायचं. कुठल्या लहान मुलाला खावं वाटत नाही हे सारं? आणि घरात नाही आणलं तरी बाहेर गेल्यावर जागोजागी मुलांच्या हातात दिसायचंच ना त्याला ते. तो प्रचंड हट्ट करायचा त्यासाठी. आईचं नाही म्हणणं त्याला कळण्याएवढा मोठा कुठे होता तो? सण समारंभ, वाढदिवस यापासून कसं बाजूला करणार होती शर्वरी त्याला?
कितीही पथ्य असलं, तरी बालहट्टापुढे तिला नमावं लागायचंच. थोडफार तरी ऐकावं लागायचंच तिला निहारचं.
डॉक्टरांनी अगोदरच सांगितलेलं, जास्त वेळ औषधांवर नाही राहू शकणार तो. सात-आठ वर्षापर्यंत फारतर.......किडनी बसवावीच लागणार.
त्यांच्या सांगण्याप्रमाणेच त्याला त्या वयातच त्रासही सुरू झाला.
जे पुढं पुढं ढकललं जात होतं, ते अगदी नाकातोंडाशी येऊन ठेपलं.
त्याच्या दोन्ही किडन्यांच काम बंद झालं, आणि साधारण नवव्या वर्षांपासून त्याला डायलिसिस सुरू करावं लागलं. त्याला किडनी बसवणं खूप गरजेचं झालं.
शर्वरीचा जीव नुसता व्याकुळ व्हायचा पोराकडे बघून. तिला वाटायचं आपलीच काढून द्यावी पोराला, आणि चुटकीत बरं करावं.
पण तेही शक्य नव्हतं, कारण तिच्याकडेच जन्मल्यापासूनच एकच किडनी होती.
सागरलाही वाटत होतं आपणच द्यावं, तर त्याला स्वतःलाच त्यावेळी थोड्या प्रमाणात हार्टच दुखणं सुरू झालेलं.
एवढ्या जवळची दोन माणसं, निहारचे आईवडिल कितीही इच्छा असूनही काही करू शकत नव्हते. निहारला किडनी बसवणं तर दिवसेंदिवस खूप गरजेचं होत चाललेलं. सगळीकडे शोधाशोध सुरू होती. मुद्दाम भरीस तरी कोणाला पाडणार?
पण तरीही कोणीतरी देवासारखं धावून येतं म्हणतात ना, तसच झालं अगदी.
निहारची आत्या मेघा, तिने निहार जन्माला आला तेव्हाच खचलेल्या भावाला धीर देताना सांगितलेलं, याला कधीही किडनी द्यावी लागली तर मी असेन. मी माझी देईन, तू काळजी करू नकोस.
त्यावेळी मेघाचं लग्नही नव्हतं झालं, तरुण वयातला आत्मविश्वास बोलत होता तिच्या तोंडातून!!
स्वतःचं लग्न करताना देखील तिने सांगूनच केलं, नंतर मी माझ्या भावाच्या मुलाला किडनी देणार आहे!! आणि तिच्या सासरकडच्यांनी हे स्वीकारलंही.
आणि खरोखरच गरज पडल्यावर जराही मागे न हटता, ती किडनी देण्यासाठी तयार झाली.
मेघाकडे दिलेला शब्द पाळायचं धैर्य होतं, जे तिने प्रसंग येताच दाखवलंही. पण आता तर तिचंही चांगलं कुटुंब होतं. छोटा मुलगा होता. तरीदेखील आपल्या भाच्यासाठी एवढा विचार करणं, खूपच मोठ्या मनाचं काम होतं. बाकीचं काही कोणी करेल एकवेळ, पण अशी वेळ आली की जवळचे सुद्धा तोंड फिरवतात, तिथे ही मेघा मोठं जिगर घेऊन आलेली, स्वतःची एक किडनी दयायला.
सागरला तर सुचेना, करावं तरी काय?
मुलगाही आपलाच आणि बहीणही आपलीच होती. तिची कितीही इच्छा असली तरी त्यांनी थोडं थांबण्याचा निर्णय घेतला. दुसरा कुठला किडनीदाता मिळतोय का पाहायचं ठरवलं. दिवस हातात कमी होते. कोणी दुसरं लवकर मिळालं नाहीच.
शेवटी मेघाकडूनच किडनी घ्यायचं पक्क झालं.
सगळ्यांना तिचीही काळजी वाटत होती आणि तितकाच अभिमानही. पण मेघा शेवटपर्यंत अनेकांनी समजावून देखील आपल्या शब्दावर राहिली. तिच्या घरच्यांनीही तिला समजावून घेतलं हे ही विशेषच!! धोका तिच्या जीवलाही होताच. तिलाही वेगवेगळया टेस्ट मधून जावं लागलं. तिची किडनी त्याला जुळणही गरजेचं होतं, पण ती जुळली. मेघाने आपलं धैर्य टिकवून ठेवलं. खरंच इतकं सोपं होतं का ते? नक्कीच नव्हतं. कठीण होतं सर्वांसाठीच खूप सगळं. पण सगळं कुटुंब, सगळे नातेवाईक पाठीशी उभे राहिल्याने निहारचं किडनीरोपण यशस्वी झालं. मेघा आणि निहार दोघही सुखरूप बाहेर पडले त्यातून. निहारला नवीन जीवन मिळालं. आणि मेघाला सर्वांचे भरभरून आशीर्वाद. इतकं पुण्याचं काम तिच्या हातून घडलं, सगळ्याच्या नजरेत केवढीतरी मोठी झाली ती!!एका अगदी मनापासून केलेल्या चांगुलपणाच्या कृत्याने.....
प्रत्येक माणसात देव असतो म्हणतात, ते तिनं तिच्या कृतीतून सिद्ध करून दाखवलं. मोठे मोठे डिंगे मारणारे तर बरेच असतात आपल्या बाजूला, पण स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतःहून गरजेला धावून येणारी मेघा सारखी एखादीच कोणी जिगरबाज असेल!!
ही कथा खरी आहे. अगदी अलिकडचीच. नावं बदलली आहेत फक्त. देवमाणसं कलियुगातही आहेत, यावर विश्वास ठेवायला लावणारी!!
तुम्हाला आवडली तर तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा आत्यासाठी आणि तिने जीवनदान दिलेल्या भाच्यासाठी नक्की असुद्या........!!
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज- हल्ला गुल्ला नक्की लाईक आणि फॉलो करा.
Previous article
Next article